जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी..

जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी..

शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती चांगल्याप्रकारे होते. बरेच शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करणे तितकेच महत्वाचे आहे. शेणखत जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते.

जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी –

1) लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असणे गरजेचे आहे. शेणाखतामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी आढळून येते. ज्यास बरेचसे शेतकरी ‘शेणकिडे’ म्हणून संबोधतात. अशा अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात.

2) भुंगेरावर्गीय किडींची मादी मे किंवा जून महिन्यात शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी देतात. त्यामुळे शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये होणारा प्रसार थांबविता येईल.

3) उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची कमतरता असताना शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात त्यामुळे शेतात त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.

4) मे महिन्याच्या शेवटी अथवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी देतात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे अळीद्वारे प्रादुर्भावग्रस्त होते.

5) काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या ज्या गोलाकार रिंगणात बसविल्या जातात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.

6) बऱ्याच वेळा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबरवाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्यक ठरते.


शेणखताचे अनेक फायदे आहेत काय ते जाणून घ्या….

1) शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते. परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते.गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो.

2) जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

3) शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होतात.

4) जमिनीतून वापरण्यात येणारे जैविककीड रोगनाशके जसे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझियम आणि जैविक खते जसे ऍझोटोबॅक्टरसह इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची वाढ नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते.

5) जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्वसन वाढून मुळांद्वारे संश्लेषित करण्यातयेणाऱ्या संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते. पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी असते.

6) पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती आणि वहनचांगल्याप्रकारे होते.

7) जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन जमिनीच्या सामूमध्येदेखील अपेक्षित बदल होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?